मुख्यामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सोशल डिस्टंसिंग’ चे उल्लंघन करणारे आणि सार्वजनिक स्थळी मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. म्हापशात आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, की गरज भासल्यास अशा लोकांना ताब्यात घेणे हा एकच उपाय शिल्लक राहील.
कोविड -१९ ची प्रकरणे राज्यात वाढत आहेत. आता सामूहिक संसर्गाला देखील सुरुवात झाल्याने, मुख्यमंत्र्यांनि मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अहवालानुसार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी लोकांना मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी न फिरण्याचे आणि सामाजिक अंतर पाळण्यासंदर्भात सांगितले. त्याचे उल्लंघन करणार्यांना किमान एक दिवसासाठी तुरुंगात ठेवण्याची गरज भासली तर ते पाऊल उचलले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सावंत म्हणाले, की सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्याकडून दंड आकारला असूनही लोकांना त्याचे गांभीर्य अजून कळले नाही. लोक मास्क शिवाय मुक्त फिरत आहेत.
“लोक या सूचना का पाळत नाहीत ते मला अजूनही समजत नाही. गरज पडल्यास उल्लंघन करणार्यांना एका दिवसासाठी तुरूंगात टाकण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा व राज्य महामारीचा कायदा वापरावा लागेल, असेही ते म्हणाले.
सावंत पुढे म्हणाले की, सामाजिक अंतर नियमांचे पालन न करणाऱ्या व मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची सूचना आपण आधीच पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, राज्यात सामूहिक संसर्ग असूनही आणखी एक लॉकडाऊन करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, “सरकार किती काळ प्रतिबंध घालू शकेल? कोविड -१९ च्या विरुद्ध लढा देण्यासाठी जागरूकता आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी (पूर्वी) लॉकडाउन लागु करण्यात आला होता. लोकांनी मास्क, सॅनिटायझर्स वापरायला हवे आणि सामाजिक अंतर राखले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
सावंत पुढे म्हणाले, की म्हापशात अजुनपर्यंत सहा पॉझिटिव्ह केसेस सापडल्या असून आवश्यकता भासल्यास कोविडचा प्रसार टाळण्यासाठी म्हापशाला कंटेन्टमेन्ट झोन करण्याची घोषणा केली जाईल.
लोकांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.